कारंजा लाड (वाशिम) : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत कारंजा येथील रहिवासी जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा मृत्यू नसून, घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत १६ सप्टेंबर रोजी कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे.
कर्तव्याच्या ठिकाणी कार्यरत असताना सुनील धोपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सहकाऱ्यांना १५ सप्टेंबर रोजी आढळून आले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती १५ सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून धोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले जाणार असून, अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती कारंजाचे ठाणेदार राजेंद्र बोडखे यांनी दिली. गत १९ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा आप्त परिवार आहे. १६ सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह आम आदमी पार्टीचे यवतमाळ संघटक वसंत ढोके, तहसीलदार आर.बी. भोसले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत धोपे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सुनील धोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप धोपे कुटुंबीयांनी केला. सुनील धोपे यांनी १४ सप्टेंबर रोजी फोन करून आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकार्यानकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर धोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली याचे निषेध म्हणून आज संपूर्ण कारंजा आज बंद ठेवण्यात आला आहे.
